मुंबई : ‘अबकी बार, किसान सरकार’ हा नारा बुलंद करीत, शेजारच्या तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र राज्यातील राजकारणात भारत राष्ट्र समितीने (BRS) शिरकाव केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातही अब की बार, किसान सरकार असा नारा देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साद घातली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. या ऑफरने येत्या काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप काय म्हणाले?
पकंजा मुंडे बीआरएसमध्ये (BRS) आल्या तर त्यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा पूर्ण होईल का असे सानप यांना विचारले असता ते म्हणाले नक्कीच, देशाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करु, 100 टक्के मला विश्वास आहे. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजाताई सक्षम आहेत, 100 टक्के त्यांना न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते. राज्यातील 288 विधानसभा या मतदारसंघात पक्ष म्हणून लढणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.