मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
“अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. “अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय,” असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.
दीपक केसरकरांनी काय दिली होती ऑफर ?
“अजितदादांबद्दल अतिशय आदर आहे. परंतु दादा हे विरोधीपक्षाचे नेते आहेत. जबाबदार नेते आहेत. सामाजिक ऐक्य राखण्यात अजितदादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील, याची मला खात्री आहे. आमची अपेक्षाच अशी आहे की, दादांनीसु्द्धा आमच्या सरकारमध्ये यावं. दादा कार्यक्षम ते मंत्री राहिले आहेत. आमच्यासोबत आले तर आम्हाला आनंदच होईल.”असे दीपक केसरकर म्हणाले होते.