इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मणिपूरच्या खमेनलोक परिसरात मंगळवारी रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडली आहे. या हिंसाचारामधील जखमींना उपचारासाठी इंफाळच्या (Imphal) रुग्णालयामध्ये दाखल करण्यता आलं आहे.
या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती समोर येईल अशी प्रतिक्रिया पोलीस अधिक्षक शिवकांत सिंह (Superintendent of Police Shivkant Singh) यांनी दिली आहे.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 115 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चाळीस हजारांपेक्षा अधिक लोक विस्थापीत झाले आहेत. मागच्या मे महिन्यात मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायामध्ये वाद झाला होता. तेव्हापासून या हिसांचाराला सुरुवात झाली आहे. या संपूर्ण हिंसाचारात आतापर्यंत एकूण 115 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.