मुंबई : गुजरातमधील (Gujrat) बेस्ट बेकरी प्रकरणात (The Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयात सत्र न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हे दोघेही मागच्या १० वर्षांपासून कारागृहात आहेत.13 डिसेंबर 2013 रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं.
काय आहे नेमके प्रकरण?
गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत वडोदरा येथील बेस्ट बेकरी जमावाच्या हल्ल्यात जाळून टाकण्यात आली होती. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बेकरी मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरुन 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी 2003 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.
या खटल्यात झहिरा शेखसह अनेक साक्षीदारांना कोर्टाने फितूर घोषित केले होते. सत्र न्यायालयाचा हा निकाल गुजरात हायकोर्टाने कायम ठेवला होता.त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांच्या मदतीने झहिराने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा खटला चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण मुंबई सत्र न्यायालयाकडे वर्ग केले.
मुंबई कोर्टाने याप्रकरणी 21 पैकी 9 जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. हा निकाल येईपर्यंत अनेक आरोपींचा मृत्यू झालेला होता. 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 9 जणांपैकी 5 जणांची सुटका केली. तर 2013 मध्ये अटक केलेल्या 4 पैकी 2 आरोपींचा मृत्यू झाला. तर उर्वरित 2 जण हर्षद रावजीभाई सोलंकी (Harshad Raojibhai Solanki) आणि मफत मणिलाल गोहिल (Free Manilal Gohil) हे 10 वर्षांपासून तुरुंगात होते. अखेर आज सत्र न्यायालयाने या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.