सोलापूर : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त स्वरूपात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात मेघाभरतीची (Meghabharti) घोषणा केली होती. या घोषणेनुसार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यांत 75 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरूणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही मेघाभरती घेण्यात येणार आहे.
राज्यात शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यावर या सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. तसेच त्यांनी कालबद्ध पद्धतीने 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. यानंतर 20 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट- ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. याबरोबर महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
जिल्हा परिषद स्तरावरच नोकर भरती
जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवर करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने तो निर्णय बदलून राज्यस्तरीय भरतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदांचा पूर्वीचा कर्मचारी भरतीचा अधिकार संपुष्टात आला होता. मात्र आता पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषद पातळीवरच कर्मचारी भरती होणार आहे. सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण 18 हजार 939 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.