पुढील 72 तास राज्यासाठी धोक्याचे !

783 0

मुंबई: राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या विभागातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर, पुण्यातही तापमान वाढलं आहे. आज पुण्यातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असेल, तर मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सिअस तापमान असेल. तर पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी वादळी वारे, यामुळे उन्हाळ्यातही पावसाळा जाणवू लागला होता. मात्र, आता राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी हंगामातील उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही जळगाव शहरात झाली आहे.

तापमानात वाढ का?
अचानक तापमानात इतकी वाढ होण्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात होणारे बदल. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात मोचा वादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यातील कमाल तापमानात आणखीन वाढ होणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा चांगला तापला असून, बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान 40 शीच्या पुढे गेले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!