रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच नागरिकांनी बारसू प्रकल्प रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोलगावमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे , फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर दुसरीकडे ठाकरे यांच्या या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून राजापूरमध्ये बारसूच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाण साधत जोरदार टीका केली.
नेमके काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधताना राज्यातील सर्वात मोठा दलाल आज बारसूत आला आहे अशी बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना जन की बात नाही तर धन की बात कळते. महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा. मातोश्रीवर खोके पोहोचावेत यासाठीच बारसूला विरोध सुरू आहे. तसेच उद्धव ठाकरेंची भूमिका हि विकासविरोधी आहे. कोकणातील जनतेचा विकास त्यांना नको आहे अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जर स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर हा प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका. मी इथ जन की बात ऐकण्यासाठी आलो आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीबाबत दिशाभूल सुरू आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारला दिला होता.