Breaking News : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती

1548 0

भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० रहिवाशी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी 12 वाजता ही दुर्देवी घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीच्या वलपाडा येथे वर्धमान नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर गोडाऊन असून वरच्या तिन्ही मजल्यावर लोक राहत होते. आज दुपारी 12 वाजता अचानक इमारती कोसळली. त्यावेळी 30 ते 35 कामगार गोदामात काम करत होते. हे सर्व कामगार आणि इमारतीतील इतर रहिवासीही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे. आतापर्यंत किती जखमी झाले ? या दुर्घटनेत किती दगावले? याची माहिती मिळू शकली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत पडल्यानंतर मोठा आवाज आला. लोकांना वाटलं कसला तरी आवाज असेल. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्याने धडाम असा आवाज आला आणि अचानक संपूर्ण परिसरात धूळच धूळ झाली. त्यामुळे लोक सावध झाले आणि आवाजाच्या दिशेने धावले. तोपर्यंत ही संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली होती. स्थानिकांनी तात्काळ इमारतीचा ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

या इमारतीतील गोदामात काम करणाऱ्या कामगाराने सांगितले की, आम्ही काही लोक जेवणासाठी गोदामात थांबलो होतो. त्यावेळी अचानक पडझड होत असल्याचा आवाज आला. त्यामुळे आम्ही गोदामाच्या बाहेर पळालो म्हणून आम्ही वाचलो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!