लाचखोर फौजदाराने ठोकली धूम ! एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

3013 0

लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. शिक्षा भोगावी लागते. तरीदेखील लाचखोरीच्या घटना वारंवार घडताना दिसतात. जालना शहरात एका फौजदाराला लाच स्वीकारताना पकडणार इतक्यात त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पळून जाताना त्याने लाचेची रक्कम रस्त्यातच फेकून दिली. अखेर एसीबीच्या पथकाने पाठलाग करून या फौजदाराला ताब्यात घेण्यात आले.

गणेश शेषराव शिंदे असे लाच घेणाऱ्या फौजदाराचे नाव आहे. तक्रारदारास जालना शहरातील कदीम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात कलम ११० ऐवजी १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार गणेश शिंदे याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबतची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पथकाने बुधवारी सकाळी जालना येथील कदीम पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. फौजदार शिंदे याने लाचेची मागणी करून ७५ हजार रूपये घेतले. परंतु, एसीबीच्या सापळ्याचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह शिंदे याने कारमधून पळ काढला. एसीबीच्या पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून शिंदे याला ताब्यात घेतले.

यानंतर, त्याच्या कारची तपासणी केली असता घेतलेली लाचेची रक्कम वाटेत फेकून दिल्याचे समोर आले. पंचासमक्ष कारची तपासणी केली असता आतमध्ये ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड व तब्बल २५ तोळे सोने आढळून आले. संबंधित मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर शिंदे याच्या जालना शहरातील घराचीही झडती घेतली असता काहीही मुद्देमाल आढळून आला नाही. मात्र त्याच्या हिंगोली येथील घराची झडती घेण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!