काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक रॅपसॉंग खूपच व्हायरल झाले होते. हे रॅपसॉंग तयार करणारा रॅपर राज मुंगासे आता मीडियासमोर आला असून त्याने इतके दिवस गायब असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
रॅपर राज मुंगासे याच्या रॅपसॉंगमध्ये त्याने ’50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी’ अशा शब्दांचा वापर केला होता. त्यामुळे हे गाणे समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शेअर केले. यानंतर राज मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यानच्या काळात अंबादास दानवे यांनी त्यांच्या वकिलाचा नंबर दिला आणि त्यांनीच राजला मदत केली. त्या दिवसापासून राज मुंगासे गायब झाला होता. त्याने आई-वडिलांनाही कुठे जातोय, याची माहिती दिली नव्हती. तो नेमका कुठंय, याची माहिती कोणलाही नव्हती.
अखेर त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. राज मुंगासे म्हणाला की, याला अटक झाली नव्हती. त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता, त्यानंतर पोलीस त्याच्या घरीही गेले होते. तो रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशाप्रकारे त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचेही त्याने सांगितले. पण मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही, कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही 50 खोके घेतलेच नसतील तर तुम्ही ते स्वत:वर ओढून का घेत आहात? मी फक्त ‘चोर’ असा उल्लेख करत गाणं बनवलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुमच्या मनाला लागणं साहजिक गोष्ट आहे, असं राज म्हणाला.
पोलीस ताब्यात घेतील याची भीती होती. अटकपूर्वी जामीन करायचा होता आणि त्या काळात तीन दिवस सुट्टी होती, म्हणून लपून राहावं लागलं, असा खुलासा राज मुंगासे याने केला. अंबादास दानवे यांनीच आज फेसबुकवर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे. जामीन झाल्यानंतर तेच राजला मुंबईवरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आपल्या गाडीतून घेऊन येत आहेत. माध्यमांशी बोलताना राज मुंगासे याला पोलिसांनी त्रास देऊ नये असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.