बारामती तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले आणि त्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला असा आरोप मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
विजय मुरलीधर गवळी (वय ५५) असे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गावातील शेतकरी असलेल्या विजय गवळी यांना खांबावर चढता येत असल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढण्यास सांगितले. विजेचा प्रवाह सुरू असताना गवळी यांचा हात विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला लागला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना संबधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी गवळी यांना मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्हीही कर्मचारी गायब झाले.
वीज कर्मचाऱ्याने गवळी यांना खांबावर चढायला लावल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांचे नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.