मोदींच्या डिग्रीबाबत विचारताच अजितदादांचा प्रतिप्रश्न- ” आता डिग्रीचं काढून काय होणार?

713 0

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदींची डिग्री मागितल्याचा कारणावरून गुजरात हायकोर्टाने त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त अवस्थेत असलेल्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर टीका केली. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न करताच अजितदादांनी दिलेले उत्तर म्हणजे राऊत यांच्या विरुद्ध घेतलेली भूमिका आहे का अशी चर्चा रंगली आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदींच्या डिग्री सर्टिफिकेटचा फोटो ट्वीट करत मोदींना लक्ष्य केलं होतं. ही क्रांतीकारी आणि ऐतिहासिक डिग्री नवीन संसदभवनाच्या प्रवेशद्वारावर लावावी अशी मागणी राऊत यांनी ट्विटरवरुन केली होती. असं केल्यास कोणी मोदींच्या पात्रतेबद्दल शंका घेणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला होता.

त्यावर अजित पवार यांना पत्रकारपरिषदेमध्ये मोदींच्या शिक्षणावरुन सुरु असलेला वाद या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजितदादा चिडल्याचे पाहायला मिळाले. अजितदादा म्हणाले, ” “अहो, 2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिलं आहे का ?” मोदींनी देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्व श्रेय मोदींनाच दिलं पाहिजे. डिग्रीवर काय?

आधीच्या काळापासून आतापर्यंत जे देशाचे पंतप्रधान किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करुन निवडण्यात आलं. इथं 543 ची संख्या आहे. त्यात ज्याचं बहुत असेल तो तिथं प्रमुख होतो. आपल्या राज्यात 146 चं ज्याचं बहुमत असेल तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतो,” असं अजित पवार म्हणाले.

राजकारणात शैक्षणिक पात्रता महत्त्वाची नसते असंही अजित पवार म्हणाले. “शिक्षणाच्या बाबतीत एमबीबीएस वगैरे झाल्याशिवाय डॉक्टर म्हणून काम करु शकत नाही पण असं काही राजकारणात नाही. त्यामुळे ते 9 वर्ष तुमच्या, माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. आता डिग्रीचं काढून काय होणार. मी अनेकदा बघतो मध्येच पंतप्रधानांच्या डिग्रीचा विषय काढला जातो. मंत्र्यांच्या डिग्रीचा विषय काढला जातो. तो महत्त्वाचा प्रश्न आहे का? नाही महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. त्याबद्दल बोलायचं नाही, चर्चा करायची नाही. सगळी मुलं मुली आम्हाला कधी नोकऱ्या मिळणार विचारत आहेत. 75 हजारांची भरती होणार होती वेगवेगळ्या विभागांमध्ये त्याचं काय झालं? ते सोडून हा काय विषय चर्चेत आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या गोष्टींना (डिग्री वादाला) महत्त्वं त्यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही,” असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!