समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबत नाही. नागपूरकडे निघालेल्या कारने ट्रकला मागून जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावचे शिक्षक भारत क्षीरसागर व त्यांची मुलगी डॉ. ज्योती भारत क्षीरसागर व ज्योतीची मैत्रीण डॉ. फाल्गुनी सुरवाडे (रा. अमरावती) अशी मृतांची नावं आहेत. तिघेजण एम.एच. ३७ जी. ३५५८ क्रमांकाच्या कारने नागपूरला जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार अकोला येथील इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर आली. सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ आले असताना समोर निघालेल्या ट्रकवर (एम.एच.०४ डी.एल. ८२३५) आदळली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. यात कारमधील तिघेही जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. भारत क्षीरसागर हे मुंगळा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून डॉ. ज्योती व डॉ. फाल्गुनी या दोघीही दंत चिकित्सक होत्या. त्यांना सोडण्यासाठी भारत क्षीरसागर हे नागपूरला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
समृद्धी महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा
समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघातांचा वेगही सुसाट झाला आहे. याच मार्गावर काही दिवसांपूर्वी मेहकरजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार, तर ७ जण जखमी झाले होते. औरंगाबादहून शेगावला जात असताना मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ वेगवान कार उलटून हा अपघात झाला होता.