राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात असून दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे. बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे.
यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीचे जवळपास १४ लाख विद्यार्थी बसले होते. जिल्हा परिषद, महसूल यंत्रणेच्या मदतीने शिक्षण विभागाने परीक्षा व्यवस्थित पार पाडली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांनी परीक्षेचे अचूक नियोजन केले होते. त्यामुळेच जुन्या पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्वच शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. तरीसुद्धा परीक्षा सुरळीत पार पडली. आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु असून एका शिक्षकाला विषयनिहाय किमान दोनशे उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्यात आल्या आहेत.
इयत्ता दहावी-बारावीचे निकाल वेळेत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाने तयारी केली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मेअखेरीस बारावी आणि १० जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.