Edited By : Bagesshree Parnekar : चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या मुहूर्तावरती केलेल कोणतेही चांगल काम किंवा खरेदी ही शुभ मानली जाते. यंदा गुढीपाडवा 22 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीराम या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले. त्या आनंदात गुढी उभारण्याची पध्दत सुरू झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. असं मानलं जातं, की घरामध्ये गुढी उभारल्यान वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सुख-समृद्धी येते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व जण आपल्या घराची विशेष साफसफाई करतात आणि सजावट करून घरातलं वातावरण प्रसन्न आणि शुद्ध बनवतात. गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरुवात होते.
गुढी उभारताना गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची पानं आंब्याची डहाळी, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचा गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविल जात. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घेतली जाते. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. ही गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात. गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा केली जाते.
- होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते.
- अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात.
- प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात.
- गुढीपाडवा हा सण साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावरती कोणतेही चांगली खरेदी अथवा कोणतही चांगल काम सुरू केलं तर ते दीर्घायू टिकून राहत. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी केली जाते.
- गुढीपाडवा हा सण चैतन्याचा, नव संकल्प करण्याचा आणि संकल्प पूर्तीचा असल्यानं या सणानिमित्त साखरेच्या गाठींचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.
गुढीपाडव्याशी निगडित आख्यायिका
1.सम्राट शालिवाहनने शकांचा पराभव केल्याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारली होती.
2. छत्रपती शिवरायांच्या विजयाची आठवण म्हणून काही लोक गुढी उभारतात.
3. भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, असही मानल जात. त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील मानल जात, याला इंद्रध्वज असही म्हणतात.
4. 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात.
5. गुढी उभारल्यानं घरात समृद्धी येते असे मानले जाते.
6. गुढीला धर्मध्वज असेही म्हणतात; म्हणून त्याच्या प्रत्येक भागाचा स्वतःचा विशिष्ट अर्थ आहे – उलटे भांडे डोके दर्शवते तर दण्ड मेरु-दण्ड मणक्याचे प्रतिरूप मानलं जातं.
7. रब्बी पीक काढणीनंतर दुबार पेरणी केल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात. चांगले पीक येण्यासाठी ते या दिवशी शेतात नांगरणी करतात.
हिंदूंमध्ये संपूर्ण वर्षभरात साडेतीन मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी हे अर्धे मुहूर्त मानले जातात. आणि गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. आणि सगळ्यांची ही सुरुवात आनंददायी, निरोगी होवो हीच सदिच्छा.