आज 30 जानेवारी आहे. अर्थात 75 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची आठवण आजही भारताला आहेच. 30 जानेवारी 1948 रोजी राजधानी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने गोळ्या घालून हत्या केली होती. यावेळी सेमी ऑटोमॅटिक बॅरोटा पिस्तूल मधून गांधीजींवर हल्ला करण्यात आला होता.
हा हल्ला अगदी जवळून करण्यात आला होता. त्यामुळे महात्मा गांधींवर फायर करण्यात आलेल्या तीन गोळ्या त्यांच्या मृत्यूला कारण ठरल्या. यातील एक गोळी मणक्या जवळ लागली होती. दुसरी गोळी ही उजव्या बाजूला बरगड्यांमध्ये घुसली होती. आणि तिसरी गोळी छातीत मणक्याच्या हाडापासून काही इंच बाजूला लागून फुफ्फुसाला भेदून गेली होती. हा हल्ला एवढा जवळून करण्यात आला होता की, त्यानंतर त्यांना वाचवणे अशक्यच होते.
या घटनेनंतर जगभरामध्ये खळबळ उडाली होती. हत्या झाल्यानंतर जो एफआयआर लिहिला गेला त्या एफआयआरची कॉपी आजही तुगलक रोड पोलीस ठाण्यात जपून ठेवण्यात आली आहे. 75 वर्ष उलटून गेले तरीही ही एफआयआर कॉपी जतन करून ठेवण्यात आली आहे. ही कॉपी पाहण्यासाठी आजही लोकांची गर्दी होत असते.
या FIR 68 विषयी जाणून घेऊयात,
30 जानेवारी 1948 रोजी ही एफआयआर लिहिण्यात आली होती. रात्री टिमटिमणाऱ्या कंदीलाच्या प्रकाशात सुरमेवाल्या पेन्सिलने ही एफआयआर उर्दू भाषेत लिहिण्यात आली होती. आजही ही एफआयआर ची मूळ प्रत तुगलक रोड पोलीस ठाण्यात लॅमिनेट करून ठेवण्यात आली आहे. या एफआयआरचा नंबर होता 68… हीच एफआयआर 68 पाहण्यासाठी आजही तुगलक रोड पोलीस ठाण्यात लोक गर्दी करत असतात.
हत्या झाल्यानंतर आठ जणांच्या विरोधात तुगलक रोड पोलीस ठाण्यात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि शस्त्र अधिनियमाण अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील तीन आरोपींची पुराव्या अभावी सुटका झाली होती. तर गोपाळ गोडसे, मदनलाल पाहावा आणि विष्णू रामकृष्ण यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडल्या प्रकरणी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली होती.