दौंड : तालुक्यातील पारगाव मध्ये भीमा नदीच्या पात्रात 18 तारखेला एका स्त्रीचा मृतदेह मासे पकडणाऱ्या व्यवसायिकांना सापडून आला होता. त्या दिवसापासून हा घटक घटनाक्रम सुरू झाला. तो थांबला 24 जानेवारीला, या सात दिवसांमध्ये रोज एक-एक मृतदेह त्या नदीपात्रामध्ये सापडत होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
परिस्थितीच गांभीर्य ओळखून पोलिसांनी देखील डोळ्यात तेल घालून हे प्रकरण उलगडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीला दोन स्त्री आणि दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे मृतदेह एकाच कुटुंबातील असून आई-वडील मुलगी आणि जावई यांचे असल्याचं उघड झालं होतं. पण त्यांच्या मागे तीन लहान मुले देखील बेपत्ता होती त्यामुळे शोध सुरूच होता.
अधिक वाचा : #CRIME NEWS : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या की आत्महत्या ? त्याच कुटुंबातील तीन लहान मुले अद्याप बेपत्ता
अखेर 24 जानेवारी रोजी भीमा नदीच्या पात्रात या तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले. प्रथमदर्शी या मृतदेहांवर कोणतेही मारहाणीचे व्रण नव्हते. त्यामुळे या चौघांनी आत्महत्या केली असावी असाच अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. पण तपास थांबला नव्हता.
पोलिसांच्या चौकस नजरेने तपासांती सहा महिन्यापूर्वी झालेल्या एका अपघाताचा संदर्भ शोधला आणि या संपूर्ण घटना क्रमाला वेगळे वळण मिळाले. सहा महिन्यांपूर्वी मयत मोहन पवार यांच्या पुतण्याचा मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये मोहन पवार यांचा पुतण्या अमोल याचा मृत्यू झाला होता. हा अपघात मोहन पवार यांच्याच कुटुंबीयांनी घडवून आणल्याचा संशय त्यांच्या चुलत भावाला होता. आणि यातूनच मोहन पवार यांच्या चार चुलत भावांनी हे हत्याकांड रचले होते.
जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अखेर या सात जणांच्या आत्महत्येचे नव्हे तर हत्येचे गूढ उकलून काढले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून पूर्ववैमनस्यातून कट रचून घडवून आणलेली हत्याच आहे हे निष्पन्न झाले आहे.