मुंबई-गोवा महामार्ग : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ४ ते ५ च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका चिमुकलीसह ८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. रायगड जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.
मृतांमध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात चार वर्षीय चिमुरडा बचावला आहे. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे.
अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.