नागपूर : ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पहावेत, कारण जे भेट द्यायला आले होते ते कुठे लिंबू, मिरच्या, टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना ?” अशी जहरी टीका आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. नागपूरमध्ये पत्रकारपरिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
निमित्त होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरएसएसच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याच… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. या वरूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत जहरी टीका केली आहे.
ते म्हणाले की, “स्वतःमध्ये काही करण्याची धमक नाही, याची कल्पना ज्याला असते. तो असं चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचे ओरबडण्याचे काम करतो. पक्ष चोरायचा नेते चोरायचे हे असलं काम तेच लोक करतात. मिंधे गट मुंबई पालिकेत पक्ष कार्यालयावर दावा करायला गेला. आज मुख्यमंत्री आरएसएसच्या कार्यालयात गेलेत. मग आता कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पहावेत. कारण जे भेट द्यायला आले होते ते कुठे लिंबू, मिरच्या, टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना ? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.