मुंबई : आज महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबई मधून वादळासारखा निघाला. या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भाजप मनसे आणि शिंदे गटातील नेते सोडले तर सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. हा महामोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून महाराष्ट्रासाठी असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने देखील यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं होतं. त्यानुसार या माहामोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
राज्यपालांनी शिवछत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र विसरू शकणार नाही. त्यांची हकालपट्टी केली जावी याच प्रमुख मागणीसाठी या महामोर्चाच आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं होतं. यावेळी संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत महापुरुषांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का ? यांना एक मिनिट सुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार उलथवून टाकण्याचा हा दिलेला इशारा आहे.
आज दिल्लीही दुर्बिणीतून पहात असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे. महाराष्ट्राची शक्ती काय आहे. आज महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्र पेटला… ही ठिणगी पडली आहे. असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आहे आणि महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत. हाच सर्वात मोठा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सरकार उलथवून टाकण्याची संधी आम्हाला कधी मिळते याची महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता वाट पाहत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.