6 डिसेंबरचा सूर्योदय आणि निळ्या सूर्याचा अस्त! डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

302 0

6 डिसेंबर 1956… या दिवसाची सकाळ उजाडली ती निळ्या सूर्याच्या अस्तानं ! महामानव, भारतरत्न, बोधिसत्व आणि दलित-शोषितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं या दिवशी महापरिनिर्वाण झालं. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे तर सूर्यास्तानं उजाडली. या निळ्या सूर्याचा अस्त होत असताना आसमंती पसरलेल्या त्याच्या काही तेजस्वी किरणांचं दर्शन घडवणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट… 6 डिसेंबरचा सूर्योदय आणि निळ्या सूर्याचा अस्त !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शेवटचं सार्वजनिकरित्या पाहायला मिळालं ते राज्यसभेत ! राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. प्रकृती बरी नव्हती तरीही बाबासाहेबांनी 4 डिसेंबरला राज्यसभेत जाण्यासाठी आग्रह धरला. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर माधवराव मालवणकर बाबासाहेबांसोबत होते. त्यांनी बाबासाहेबांना तपासलं आणि दिल्लीला जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं मात्र बाबासाहेबांची ही संसदेतली शेवटची भेट ठरली. बाबासाहेब शेवटचे दिसले ते राज्यसभेत.

राज्यसभेतून आल्यानंतर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारच्या सुमारास माईसाहेबांनी आंबेडकरांना उठवून कॉफी दिली. 26, अलिपूर रोडवरील बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर बाबासाहेब आणि माईसाहेब गप्पा मारत बसले. तितक्यात तिथं नानकचंद रट्टू आले. नानकचंद रट्टू हे मूळचे पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातले. नोकरीच्या शोधात ते दिल्लीत आले, बाबासाहेबांशी गाठ पडली आणि पुढं त्यांची सावली बनून राहिले.

16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा होणार होता. बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूरसारखं धर्मांतर व्हावं, असं मुंबईतील नेतेमंडळींना वाटत होतं. प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं, असं माईसाहेबांनी म्हटल्यानंतर विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्याचं बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं.

नंतर बराच वेळ बाबासाहेब रट्टूंना टायपिंगचा मजकूर सांगत बसले आणि अकरा-साडेअकराच्या सुमारास झोपले. रट्टूंनाही उशीर झाल्यानं ते देखील त्याच बंगल्यात झोपले. 5 डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाणाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास बाबासाहेब उठले. माईसाहेब आणि बाबासाहेबांनी चहा घेतला आणि नानकचंद रट्टू देखील चहा घेऊन ऑफीसला जाण्यासाठी निघाले. बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉ. मालवणकरांनी एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात गप्पा मारत बसले. त्यावेळी बाबासाहेबांनी काही वर्तमानपत्रं वाचली. बाबासाहेबांना औषधं, इंजेक्शन देऊन माईसाहेब स्वयंपाकघरात कामाला गेल्या.

बाबासाहेब आणि डॉ. मालवणकर तिथंच गप्पा मारत बसले. बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहीत-वाचीत बसले होते. ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावना लेखनाचं काम ते पूर्ण करत होते. बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या आणि जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपी गेले. बाबासाहेब झोपलेले असताना माईसाहेब खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉ. मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते. त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती म्हणून तेही माईसाहेबांसोबत बाजारात गेले.

बाबासाहेबांची झोपमोड नको म्हणून ते त्यांना न सांगताच निघून गेले. दुपारी अडीचच्या सुमारास बाजारात गेलेले माईसाहेब आणि डॉ. मालवणकर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास परतले. बाबासाहेबांसाठी कॉफी बनवण्यासाठी माईसाहेब स्वयंपाकघरातच गेल्या. रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत ठरली पूर्वनियोजित भेट असल्यामुळं बाबासाहेब आणि ते शिष्टमंडळ दिवाणखान्यात चर्चा करत बसले. याचदरम्यान डॉ. मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. डॉ. मालवणकरांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेनं निघाले. जैन धर्मीयांचं शिष्टमंडळही निघून गेल्यानंतर बाबासाहेब ‘बुद्धमं सरणं गच्छामि’ या बुद्धवंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले.

थोड्या वेळानं माईसाहेबांनी दिवाणखाण्यात डोकावून पाहिलं तेव्हा बाबासाहेब रेडिओग्रामवर बुद्धवंदनेची तबकडी लावण्यास नानकचंद रट्टूंना सांगत होते. मग जेवणाची वेळ झाल्यावर जेवणाच्या टेबलावर बसले आणि थोडं जेवणही केलं. त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या. माईसाहेबांचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले आणि ‘चलो कबीर तेरा भवसागर डेरा’ हा कबीरांचा दोहा तालसुरात म्हणू लागले. त्यानंतर काठीचा आधार घेत शयनगृहाकडे वळले.

जाता जाता त्यांनी नानकचंद रट्टूंना ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’च्या प्रस्तावनेची प्रत आणि एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. आपलं काम आटोपून रट्टू त्यांच्या घरी निघून गेले आणि माईसाहेब स्वयंपाकघरात आवराआवरीच्या कामात गुंतल्या. 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू त्यांच्या घरी गेल्यानंतर बाबासाहेबांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली तसेच एस. एम. जोशी, आचार्य अत्रे आणि ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडेअकराच्या सुमारास झोपी गेले मात्र 5 डिसेंबरची ती रात्र ही बाबासाहेबांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली. 6 डिसेंबर 1956 रोजी माईसाहेब नेहमीप्रमाणं उठल्या आणि चहाचा ट्रे तयार करून बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडं गेल्या. त्यावेळी सकाळचे सात-साडेसात वाजले होते.

माईसाहेबांनी खोलीत गेल्यावर बाबासाहेबांना दोन-तीन वेळा आवाज दिला पण त्यांची काही हालचाल दिसली नाही मग त्यांनी त्यांना हातानं हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण… बाबासाहेबांचं झोपेतच महापरिनिर्वाण झालं होतं. ते पाहून माईसाहेबांनी हंबरडा फोडला. रडवेल्या आवाजात बंगल्यातील मदतनीस सुदामाला हाक मारली, डॉ. मालवणकरांना फोन लावला आणि आता काय करू, असं विचारलं. डॉ. मालवणकरांनी ‘कोरामाईन’ इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते. मग माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूंना बोलावून आणायला सांगितलं. सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना घेऊन आले.

कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागलं तर कुणी कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करू लागलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बाबासाहेब आपल्या सर्वांना सोडून गेले होते. बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता सर्वत्र वणव्यासारखी पसरली आणि हजारो आंबेडकर अनुयायी दिल्लीतल्या 26, अलिपूर रोडच्या दिशेनं येऊ लागले. बाबासाहेबांवर मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. मग दिल्लीतल्या 26, अलिपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार, बाबासाहेबांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली. जगजीवनराम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली. बाबासाहेबांचं पार्थिव नागपूरमार्गे मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलं आणि पुढं मुंबईत निघालेली अभूतपूर्व अंत्ययात्रा साऱ्या देशानं पाहिली.

मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी बाबासाहेबांना ग्रासलं होतं. मधुमेहानं त्यांचं शरीर पोखरून जर्जर झाले होतं. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत बाबासाहेबांनी केलेला कार्यपट साऱ्या देशवासियांच्या नजरेसमोर उभा राहिला पण कोण म्हणतं आंबेडकर गेले ? आंबेडकर कधी मरत नसतात; आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळींच्या रूपानं ते अमर राहात असतात. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र देणारा निळा सूर्य लोप पावला खरा पण आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळींच्या रूपानं हा निळा सूर्य तुम्हा-आम्हाला कालही प्रकाश देत होता आजही देत आहे आणि यापुढंही प्रकाश देत राहील. महामानव, भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन !

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!