TOP NEWS SPECIAL : 26/11 च्या कटू आठवणी; ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं ?

194 0

मुंबई : आज 26/11 अर्थात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याची एक कटू आठवण…26 नोव्हेंबर 2008 च्या ‘त्या’ रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली होती..या घटनेला आज 14 वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात या घटनेच्या कटू आठवणी आजही जिवंत आहेत. याच निमित्तानं पाहूया 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रकाश टाकणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता.सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. या गोळीबाराने मुंबई अक्षरशः थांबली. हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं.हा हल्ला इतका मोठा असेल याचा कुणालाही अंदाज आला नव्हता. पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्याच्या गांभीर्याचा अंदाज येऊ लागला.

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं.या दरम्यान 160 हून जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला.अधिकृत आकडेवारीनुसार, लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले होते.छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकावर त्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी हजर होते. दहशतवाद्यांनी तिथंही अंदाधुंद गोळीबार केला.

इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.त्यानंतर पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं, पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला. या गोळीबारात 58 लोक मृत्युमुखी पडले होते.पुढे ओबेरॉय हॉटेलमध्ये दहशवादी मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन घुसले.त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे, ताजमहाल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग. ताज हॉटेल जवळपास 105 वर्षं जुनं आहे.

त्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते, अचानक दशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.सरकारी आकडेवारीनुसार, हॉटेल ताजमध्ये एकूण 31 लोक मृत्यमुखी पडले. आणि इथंच चार दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पुढे कामा हॉस्पिटलबाहेर झालेल्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले.

या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसलाही टार्गेट केलं. ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे. नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं.या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं, पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही. इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहिदांना टॉप न्यूज मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!