23 नोव्हेंबर 2019 हाच तो दिवस.. स्थळ राजभवन. याच दिवशी महाराष्ट्रचं नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीली होती. सगळीकडे एकच चर्चेचा विषय..तो म्हणजे माजी मुख्यमंत्री, आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा शपथविधी अन् हा दिवस आजही तितकाच चर्चेचा विषय आहे. या शपथविधीला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी…जाणून घेऊयात ‘TOP NEWS मराठी’च्या खास रिपोर्टमधून…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली दोन परस्परविरोधी विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणारे हे दोन नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कसे घडू शकते?, असाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता.
एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असतानाच आजच्याच दिवशी अजित पवारांच्या मदतीने फडणवीस दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. ज्या आमदारांच्या भरोशावर अजित पवार फडणवीसांसोबत आले होते, त्या आमदारांनी ऐनवेळी अजित पवारांच्या विरोधात आणि पक्षाच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर अवघ्या 80 तासातच हे सरकार पडलं.
या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याला जरी आज तीन वर्षे पूर्ण होत असली तरी 23 नोव्हेंबर हा दिवस देशाच्या राजकारणातील एक मोठा राजकीय दिवस म्हणून कायमच सर्वांच्या स्मरणात राहील एवढं मात्र नक्की!