पुणे : पुण्यापासून काश्मिरपर्यंत विविध सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या इंद्राणी बालन फौंडेशन (पुणे) आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने आंबेगाव येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी व ग्रामपंचायत लोणी यांना सुमारे १५ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका देण्यात आली.
‘इंद्राणी बालन फौंडेशन’चे अध्यक्ष आणि उद्योजक पुनीत बालन तसेच माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज यांच्या हस्ते पुण्यात या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच ऊर्मिला धुमाळ यांच्याकडे त्यांनी औपचारीकपणे या रुग्णवाहिकेची चावी दिली. परिसरातील रुग्णांना सेवा देण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे.
यावेळी माजी सरपंच उद्धवराव लंके, चेतन लोखंडे, अशोक आदक पाटील, राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड, सावळेराम नाईक, दिलिप वाळुंज, बाळासाहेब गायकवाड, पिंटू पडवळ, उद्योजक राजु वाळुंज, सुरेश वाळुंज, प्रकाश वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनीत सिनलकर, मयूर लोखंडे, सोमनाथ कदम, पांडुरंग वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव, बाळशिराम वाळुंज, सतीश थोरात, सुमित वाळुंज आदी उपस्थित होते.
यावेळी इंद्राणी बालन फौंडेशन, आरएमडी फौंडेशन यांच्या वतीने लोणी येथे करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती उदयसिंह वाळुंज यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘इंद्राणी बालन फौंडेशन आणि आरएमडी फौंडेशन यांच्यावतीने कोट्यावधी रुपये खर्च करून भैरवनाथ विद्याधाम विद्यालयासाठी सुसज्य इमारत बांधण्याचे काम सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होण्यास मदत होणार आहे. तसेच गावाशेजारील तळ्याचे काम केल्यामुळे परिसरातील नैसर्गिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नेहमी उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होऊन त्याचा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना फायदा होणार आहे. ‘आरएमडी फौंडेशन’च्यावतीने परिसरात सुमारे सात हजार वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
बेल्हे-जेजुरी महामार्गावर वाढत्या वाहनांचे प्रमाण बघता गेल्या काही दिवसात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळतातच असे नाही आणि अशा वेळी जीव गमवावा लागण्याची भीती असते. त्यामुळे परिसरातील सात-आठ गावांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्यास या रुग्णवाहिकेमुळे मदत होणार असल्याचे चेतन लोखंडे यांनी सांगितले. अविनाश वाळूंज यांनी सूत्रसंचालन केले तर उदयसिंह वाळुंज यांनी आभार मानले.