मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.
हर हर महादेव या चित्रपटाचे शो बंद पाडल्या प्रकरणी आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केली होती. सकाळी 10:30 च्या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्यासह बारा जणांना ठाणे पोलिसांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणले आहे.
दरम्यान आव्हाड आणि त्यांच्यासह अटकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जामिनावर देखील आज निर्णय होणार आहे. या सर्वांवर कलम 323 आणि कलम 504 लावण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला नाही तर ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “आमची इच्छा आहे की महाराष्ट्रात विकृती दाखवली जाऊ नये. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजां विरोधात लढले हे चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचं काम सुरू असून, विकृत इतिहास दाखवला जात आहे. मला फाशीवर दिले तरीही मी माफी मागणार नाही.” अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली आहे.