शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांनी सुषमा अंधारे यांना पात्र लिहून त्यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. हे पत्रं व्हायरल झालं आहे. तुम्ही हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांवर आडवा हात यापूर्वी मारला नसेल असे होऊच शकत नाही. “म्हतारे – थरथरते हात त्यांच्या हातात काय करणार तलवार देवून” अशी बाळासाहेबांवर टीका आपणच केली होतीत किंवा “हा महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर नाही” म्हणत उद्धव ठाकरेंचा बाप काढला होतात किंवा युवराज आदित्य ठाकरे यांच्या लुंगी पर्यंत देखील तुम्ही गेला होतात.असा सवाल त्यांनी या पात्रातून केला आहे.
प्रति,
सुषमा अंधारे जी
मार्फत शरदजी पवार तर्फे (आता) उद्धवजी ठाकरे
जय नवं फुरोगामी हिंदुत्व..!
पत्रास कारण की, आपण सध्या महाराष्ट्रात हिंदुत्वाची विजयी टिमकी वाजवत फिरत आहात, हे पाहून अत्यानंद होत आहे. एक कट्टर हिंदू विरोधी विचारांची आमची रणरागिणी (वगैरे वगैरे उपमा सध्या मिळत आहेत) आज चक्क हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात आहे हे पाहून डोळे भरून आले आहेत, मन ओसंडून वाहत आहे. म्हणून म्हंटले चला बोलावे एकदा, शोधावे तुमच्या परिवर्तनाचं गमक आणि शहाणे करून सोडावे इतर सगळ्या सगळ्या तथाकथित फुरोगामी विरोधकांना..!
ताई.. बघा ना..! फक्त काही महिन्यांपूर्वी आपण नावे ठेवत होतात रामाला – रामायणाला, कृष्णाला – महाभारताला.. रामावर तर नको त्या बोललाच आहात, पण त्या बिचाऱ्या शबरीला पण तुम्ही सोडले नाहीत. एका स्त्रीची ( सीता माई) बाजू घेण्याच्या नादात तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या ( शबरी) अब्रुला हात घातलात, घसरत गेलात. पण हरकत नाही; आपण स्त्री असल्यामुळे एवढे स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे.!
कृष्णाला तर तुम्ही पुरतेच बदनाम केले होते. बायकांची कपडे पळविणे, अंघोळीला गेलेल्या बायकांना चोरुन पाहणे अजून काय नि किती आरोप तुम्ही हिंदूंच्या श्रद्धास्थानावर करत होतात. रामायण – महाभारत थोतांड आहे हे आपण म्हणत होतात.. त्याच थोतांडाना पवित्र मानणाऱ्या विचारसरणीच्या मांडीला मांडी लावून आपण आज बसल्या आहात, हा चमत्कारच म्हणावा लागेल.
ताई,
हिंदूचे देव, हिंदू धर्म हे तुमच्या निशाण्यावर होते. त्यामुळे तुम्ही हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांवर आडवा हात यापूर्वी मारला नसेल असे होऊच शकत नाही. “म्हतारे – थरथरते हात त्यांच्या हातात काय करणार तलवार देवून” अशी बाळासाहेबांवर टीका आपणच केली होतीत किंवा “हा महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर नाही” म्हणत उद्धव ठाकरेंचा बाप काढला होतात किंवा युवराज आदित्य ठाकरे यांच्या लुंगी पर्यंत देखील तुम्ही गेला होतात. तसे म्हणाल तर यात नवल ते तसे काहीच नाही..! उलट नवल हे आहे की अश्या हिंदू विचारांचा प्रभाव असणाऱ्या ( पूर्वी तरी होता..) उद्धव ठाकरे यांच्या सोबत आता तुम्ही बसलात. ताई, हे खरे नवल आहे. हा आपला पूर्ण अंतरंगातील बदल अत्यंत ठळक, सुस्पष्ट आणि हिंदू विचारसरणीसाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.
ताई, आपल्या प्रवेशाच्या पायगुणामुळे उद्धव ठाकरेजी यांची मात्र चांदी झाली असेच म्हणावे लागेल. आता हेच पहा ना तुम्ही आल्या नि उद्धव यांच्या वडिलांनी कष्टाने उभारलेला पक्ष त्यांच्या स्वतःच्या नावावर झाला. तर दुसरीकडे पक्षाचे चिन्ह असलेले प्रभू श्रीरामाच्या हातातील धनुष्यबाण देखील गायब झाला आणि आता नव्याने कोलीत हाती आले.
असो… ते काहीही असो पण आपण हिंदुत्वाची कास हाती घेतलीत हे सुखावणारे आहे. खऱ्या हिंदुत्वाचा आवाज आपण लोकांपर्यंत पोहचवाल याची खात्री आहे. त्यामुळे कमीत कमी दुसरे कोणी नाही पण फुरोगामी विचारसरणी तरी प्रभावित होईलच.
लोभ असावा
आपली,
सौ. राजश्री पाटील