दिवाळी हा सण हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात मोठा सण आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. तेलाने सर्व अंगाला चोळून सुगंधित उताणे आणि साबणाने स्नान केले जाते. घरातील सर्वाना औक्षण केले जाते.
अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे.