कोरोनामुळं माणसं बेजार झाली होती आणि आता लम्पीमुळं जनावर बेजार झाली आहेत. लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील 338 गावांपर्यंत पोचलाय. या व्हायरसनं आतापर्यंत 2664 जनावरांना ग्रासलं असून 43 जनावरं दगावली आहेत. लम्पी आजार नेमका काय आहे त्याची लक्षणं काय ? हा आजार माणसांना होतो का ? जाणून घेऊयात लम्पी या आजाराविषयी…
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लम्पी हा आजार माणसांना होत नाही शिवाय प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून संक्रमितही होत नाही. म्हशींना हा आजार होत नाही. त्यामुळं त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. हा आजार प्रामुख्यानं गाय आणि बैलाला होतो. महाराष्ट्रात मार्च 2020 मध्ये या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी 2 लाखांहून अधिक रुग्ण होते. यापैकी 18 जनावरांना आपला जीव गमावला होता. या रोगाची लक्षणं म्हणजे प्राण्याची भूक कमी होणे, ताप येणे आणि अंगावर सूज येणे.
लंपी विषाणू नेमका काय आहे आणि तो कसा पसरतो ?
युरोपियन अन्न सुरक्षा प्राधिकरणच्या मते लम्पी हा एक त्वचारोग आहे आणि तो प्राण्यांमध्ये आढळतो. तो रक्तपिपासू कीटकांद्वारे पसरतो. ज्या प्राण्यांना हा रोग आधी झालेला नाही त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर ताप येतो आणि त्वचेवर फोड येतात.
विषाणू पसरण्याची नेमकी कारणं काय आहेत ?
पहिलं कारण म्हणजे शहरात आणि खेड्यात जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ. रक्तपिपासू माशा आणि डासांमुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरतो. या विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी काही दिवस जावे लागतात. त्यामुळं सध्या या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. अज्ञान हे विषाणू पसरण्याचं दुसरं कारण आहे. अनेकांना या रोगाची नीटशी माहिती नाही. जिथे प्राणी राहतात तिथून माशा आणि डासांना हाकलणं अतिशय गरजेचं आहे.
लम्पी व्हायरसची लक्षणं कोणती ?
प्राण्यांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते. ताप येतो. दुधाचे प्रमाण कमी होते. चारा खाणं, पाणी पिणं कमी होतं. हळूहळू डोकं, मान, कास आदी भागांच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. तोंडातील व्रणामुळं आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यांतील व्रणामुळं चिपडे येतात. डोळ्यांची दृष्टी बाधित होते शिवाय पायाला सूज येवून काही जनावरं लंगडतातसुद्धा !
लम्पी या रोगाविषयी माहिती देण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक जनावरांचं लसीकरण झालं असून 16 लाखांहून अधिक लशी राज्याकडं उपलब्ध आहेत. शिवाय पुढील आठवड्यात 50 लाख लशी उपलब्ध होणार असल्याचंही सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं.
राज्यात कोणत्या जिल्ह्यांत पसरलाय लम्पी ?
राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर ,बीड , सातारा, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, अमरावती, बुलढाणा आदी जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. याबाबत केंद्र सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या ठिकाणी गुरांना या रोगाची लागण झाली आहे त्याच्या पाच किलोमीटर हद्दीतच लसीकरण करावं, असं सरकारचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी विषाणूची लागण झाली तो परिसर स्वच्छ करावा. तसंच निरोगी जनावरांना Ectoparasiticide हे औषध द्यावं, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
जनावरांमध्ये लम्पीची लक्षण आढळून आल्यास काय काळजी घ्यावी ?
बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळं बांधावं. लम्पी सदृश लक्षणं आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांशी तातडीनं संपर्क साधावा. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच चराईसाठीची स्वतंत्र व्यवस्था करावी. बाधित परिसरात स्वच्छता करावी, निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. लम्पी ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृत प्राण्यास कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून त्याची विल्हेवाट लावावी. बाधित क्षेत्रात गाई-म्हशींची विक्री, पशू बाजार बंद करावेत.
आपल्या जनावरांची वेळीच आणि योग्य ती काळजी घेतल्यास त्यांना लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचवता येऊ शकते. त्यामुळं पशुपालक शेतकरी बांधवांनो, घाबरू नका मात्र आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्या.
महाराष्ट्रातील 338 गावांपर्यंत पोचला लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव
लम्पीमुळं आतापर्यंत 43 जनावरं दगावली, 2664 जनावरं बाधित
लम्पी हा आजार माणसांना होत नाही
हा विषाणू प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून संक्रमित होत नाही
हा आजार प्रामुख्यानं गाय आणि बैलाला होतो. म्हशींना होत नाही
लंपी विषाणू नेमका काय आहे आणि तो कसा पसरतो ?
विषाणू पसरण्याची नेमकी कारणं काय आहेत ?
लम्पी हा एक विषाणूजन्य त्वचारोग; तो प्राण्यांमध्ये आढळतो
रक्तपिपासू कीटकांद्वारे पसरतो
रक्तपिपासू माशा आणि डासांमुळे मोठ्या प्रमाणावर पसरतो
जिथे प्राणी राहतात तिथून माशा आणि डासांना हाकलणं गरजेचं
लम्पी व्हायरसची लक्षणं कोणती ?
प्राण्यांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते
ताप येतो दुधाचे प्रमाण कमी होते
चारा खाणं, पाणी पिणं कमी होतं
त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात
तोंडातील व्रणामुळं आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो
डोळ्यांतील व्रणामुळं चिपडे येतात. डोळ्यांची दृष्टी बाधित होते
पायाला सूज येवून काही जनावरं लंगडतात
आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक जनावरांचं लसीकरण
16 लाखांहून अधिक लशी राज्याकडं उपलब्ध
पुढील आठवड्यात 50 लाख लशी उपलब्ध होणार
राज्यात 17 जिल्ह्यांत पसरलाय लम्पी