आजकालच्या पालकांना मुलांचा चिडचिडेपणा, अभ्यास न करणे, मोबाईल-लॅपटॉप घेऊन बसणे, मैदानी खेळ खेळण्यास नकार देणे आणि जंक फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांमुळे अगदी डॉक्टर देखील गाठावे लागत आहेत. जर तुमच्याही मुलांमध्ये अशी समस्या तुम्हाला जाणवत असेल , तर हा लेख तुम्ही अवश्य वाचा …
पूर्वी मुलं लहानाची मोठी केव्हा होतात, हे देखील समजत नव्हतं असं तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल . परंतु त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती . मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये अनेक मंडळी होती . लहान मुलांचा खेळ होता. त्यामुळे एकमेकांबरोबर मुलं लहानची मोठी हसत खेळत होत होती .
पण सध्या लहान कुटुंब, त्यामुळे मुलांना एकटे राहण्याची सवय वाढते आहे. त्यासह सध्याचा होऊन गेलेला कोविडचा काळ मुलांमधील मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आकर्षण देखील व्यसनात बदलण्यासाठी कारण ठरले आहे . मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानच उरली नाहीयेत, तर शाळेतील स्पर्धा, आई-वडिलांच्या अपेक्षा यामुळे मुलांचा चिडचिडेपणा वाढणं हे खरंतर खूपच नैसर्गिक आहे .
मग यासाठी काय करायचं ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल . आपल्या आयुष्यात तर बदल करणे शक्य नाही. सध्या आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात. मग अशीच समस्या जर तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टींचे बदल हे तुमच्या मध्येच करून घ्या
1.मुलांना वेगवेगळे खेळ आणून द्या , लॅपटॉप आणि मोबाईल ते विसरतील यासाठी त्यांना खेळ आणून द्या
2.मैदान जिथे असेल तिथे मुलांना स्वतः सुट्टीच्या दिवशी तरी घेऊन जा . अशावेळी मुलांना मैदानापर्यंत सायकल , चालवत नेणे योग्य ठरेल . याने तुमचा स्वतःचा देखील व्यायाम होईल आणि मुलांना वेळ देखील देता येईल
3.सायकल ,फुटबॉल ,क्रिकेट बॅट-बॉल ,रॅकेट्स ,हॉकी स्टिक असे मैदानी खेळांचे अनेक पर्याय आहेत . जे मुलांना घेऊन द्या आणि मित्र-मैत्रिणी जर खेळण्यासाठी नसतील तर आठवड्यातून एक दिवस तरी त्यांचा मित्र किंवा मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करा.
4. मुलं जवळपास खेळत असताना मोबाईलचा वापर करणे टाळा. तुम्ही त्यांच्याकडून ज्या अपेक्षा करत आहात जसे की, त्यांनी मैदानी खेळ खेळावेत ,घरातील वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात ,वस्तूंचा योग्य वापर करावा ,शांतपणे बोलावे ,वाचन करावे ,आई-वडिलांचा सन्मान करावा तर हे सर्वप्रथम आधी तुम्ही त्यांच्यासमोर करा . मग ते तुमचं अनुकरण करतील.
5.बऱ्याच वेळा चार चौघांमध्ये असताना मुले विचित्र वागतात . एखादी वस्तू घेऊन देण्याचा हट्ट करतात. दुसऱ्या लहान मुलाचा खेळ मागतात ,आणि अगदी तुमचे अनुभव चित्र-विचित्र असतीलच… मग अशावेळी त्यांना चारचौघात ओरडण्यापेक्षा तिथे जमेल तितके शांतपणे त्यांना समजावून सांगा , आणि घरी आल्यानंतर एकांतात त्यांना त्यांच्या कृत्याची जाण करून द्या . समजावून सांगणे ,ओरडून सांगणे आणि शेवटी ऐकलेच नाही तर शिक्षा करणे … असे धोरण मुलांच्या बाबत ठेवा. जर तुम्ही चार चौघात त्यांना ओरडणे किंवा मारणे असे सुरू केले तर ते तुमच्या बाबत देखील चिडचिडे होऊन नेहमीच आक्रमक राहतील.
6.एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं की मुलं हमखास ती करणारच , असाही अनुभव तुम्हाला नक्कीच आला असणार . मग अशावेळी ती गोष्ट का करायची नाही त्यातून मुलांना होऊ शकणारा शारीरिक त्रास ,दुखापत, गंभीरता त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा . पण हो एकदाच. उदाहरणार्थ ; जर का तुम्ही गरम तव्याजवळ जाऊ नको असं तुमच्या लहान मुलाला सांगितलं ,पहिल्यांदा सांगून तरीही त्यांनी ऐकलं नाही तर गरम तव्याला त्याला हात लावू द्या . चटका बसल्यानंतर काय त्रास होतो हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य मुलांना समजतच नाही. अनेक पालक मुलांसाठी खूप जास्त पझेसिव्ह असतात . त्यांना चटका बसणे सोडा ,भाजणे सोडा साधं पडझड होऊन झालेली छोटी दुखापत देखील काही पालकांना खूप त्रासदायक वाटते . परंतु लक्षात ठेवा जोपर्यंत वेदना काय असते हे मुलांना समजणार नाही तोपर्यंत ते स्वतः अशा गोष्टी करणे टाळणार नाहीत.
7. लहान सहान गोष्टींमध्ये त्यांना अडवणं थांबवा. घरात पसारा करणे ,खेळण्या पसरवून ठेवणे, भांडे पसरून ठेवणे, पळापळ करणे ,भिंतीवर चित्र काढणे अशा अनेक करामती लहान मुलं करतच असतात . तुम्ही जर त्यांना हे करण्यापासून अडवत असाल तर थांबा . केवळ त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या हालचालींकडे लक्ष द्या . त्यांना प्रत्येक गोष्ट करण्यापासून अडवणे देखील त्यांची चिडचिडेपणा वाढ होते . याच गोष्टी मुलं मोठे झाल्यानंतर तुम्हाला सुखावून देतील.
तर मग आजचा लेख तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणती गोष्ट तुम्ही अमलात आणणारा आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.