मुंबई : शिंदे गटानं बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून आपली बाजू मांडली. या मुलाखतीनंतर शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरेंनाच उत्तर दिलं.
“उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत…!” शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुख आहेत. आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू, आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायची गरज नाही. आमची लायकी नाही. आम्ही त्यांची बरोबर करू शकत नाही. आम्ही एक वेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरू शकत नाही, असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला उत्तर दिलं. संजय राऊत हे जादूटोणा करणारे आणि काळा दोरा आहेत, अशी टीकाही शिरसाट यांनी यावेळी केली आहे .
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखती दरम्यान बंडखोर आमदारांना पालापाचोळा म्हटल्यानंतर शिरसाट चांगलेच संतापले आहेत . त्यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले की , “आम्हाला पालापाचोळा म्हटल्यावर वाईट वाटलं. काम संपलं म्हणून उचलून कचऱ्यात टाकलं, असं म्हणणं कितपत योग्य ? या गळालेल्या पालापाचोळ्याचं खतही तयार होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे आमच्यासाठी खूप मोठे आहेत. त्यांच्या पुण्याईमुळं आम्ही आमदार, खासदार झालो आहोत. तुम्हाला राजकारण करायचं आहे तर बाळासाहेबांचं वापर कशाला करता ?
‘एका दर्जावर गेलेल्या मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय कधी सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत आहे. बाळासाहेबांना खुजे करू नका. ‘जी पानं गळाली आहेत, त्यांचा अपमान करू नका. मनोहर जोशी तुमच्याजवळ कधी दिसले नाहीत. ढाके कधी दिसत नाहीत. काळ बदलत जातो, नवीन माणसं आली आहेत ती स्वीकारा, पालापाचोळा कसं म्हणू शकता ? ढाके, मनोहर जोशी, शरद आसारे कधी शिवसेनेचे पान नव्हते का ? शिवसेनेच्या नेत्यांनी खेड्यापाड्यात जाऊन काम केलं आहे. आम्ही उभं आयुष्य या पक्षात घालवलं आहे. 38 वर्षे या पक्षात घालवली आहेत, आम्हाला पालापाचोळा म्हणताय ? उद्या तुम्हाला कुणी म्हटलं तर काय होईल ?”
मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरही शिरसाटांनी पलटवार केला आहे . “आजारी असताना बंडाची हालचाल सुरू होती, हे उद्धव ठाकरेंचं विधान चुकीचं आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना बैठका झाल्या नाहीत. हे सर्व वर्षभरापासून सुरू होतं. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते ,तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्ही यज्ञ केले होते. आम्ही कोणत्या पक्षात जाणार आहोत याबद्दल चिंता करू नका, आम्ही आमचं काय ते पाहू ना ! आम्ही सपा किंवा एमआयएममध्ये जाणार याचा विचार करू नका, आम्हाला कुठं जायचं तिथं आम्ही जाणार आहोत.”
आमदार संजय शिरसाट यांनी ही सारी अवस्था संजय राऊतांमुळं झाली, असं म्हणत राऊतांवरही निशाणा साधला आहे . शिरसाट म्हणाले की , “संजय राऊत यांनी खोडा घातला. संजय राऊत सारखा माणूस गेला आणि त्यानं जुळवाजुळव केली, त्यामुळं आज ही अवस्था झाली. त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. उद्धव ठाकरेंना कसा राग येईल, शरद पवार कसे जवळ येतील, हे असं राऊतांनी घडवून आणलं. संजय राऊत हे जादूटोणा करणारे आणि काळा दोरा आहेत”.