महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित आज (सोमवारी) जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी ११ वाजता जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे मानकरी पेशवे यांनी आदेश देताच श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा सुरु झाला. यावेळी जेजुरी गडावर पालखी सोहळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी हजारो भाविकानी भंडाराची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
मानकऱ्यांनी इशारात केल्यानंतर देवाचे खांदेकरी, मानकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात उत्सवमूर्तींची पालखी क-हा स्नानासाठी उचलली.
यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून पालखी सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने क-हा नदीकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी ४ वाजता कऱ्हा नदीवर उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात येणार आहे.