वरुणराजा बरसणार ! पुढच्या ३-४ तासांत राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज

481 0

मुंबई- उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना प्रतीक्षा आहे ती पावसाच्या थंड शिडकाव्याची. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली आणि कोकणातल्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कालच अंदमानात मान्सूनचं आगमन झालं आहे. 27 मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. आता आहे तशीच स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून 6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 11 जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी खंड पडल्यानं 10 जुलैपर्यंत या भागांत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली होती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच वरुणराजाचं आगमन होण्याचे संकेत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. अंदमानात लवकर हजेरी लावल्यामुळं आता राज्यातही वरुणराजाचं लवकर आगमन होणार आहे. येत्या ४, ५ दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तळकोकणाल २ जूनपर्यंत मान्सूनचे (Monsoon) आगमन होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तसे संकेतही मिळण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या समुद्रात सध्या लाटांसोबत सध्या फेस मोठ्याप्रमाणावर वाहून येत आहे. पावसाचे आगमन होण्यापूर्वी लाटांना अशाप्रकारे फेस यायला (फेणी) सुरुवात होते, असे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. याशिवाय, समुद्रात दक्षिण दिशेला वारे वाहायला लागले आहेत. या सगळ्या गोष्टी मान्सूनच्या आगमनाचे संकेत मानले जातात. त्यामुळे लवकरच मान्सून कोकणात दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो इशारा देण्यात आला आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!