मी पक्ष कार्यालयात जाणार नाही; राजसाहेब आले तरच जाईन !
हे पुढं-मागं, पुढं-मागं कुठपर्यंत चालणार सांगू शकत नाही..!
मी ‘राज’मार्गावर चालणारा माणूस… मी महाराष्ट्र सैनिक !
‘एकला चलो रे’ ही माझी भूमिका पण मी पक्षासोबत..!
……………………
‘मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवा नाहीतर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू,’ असं राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत म्हटलं आणि या घोषणेमुळं पुण्यातील ‘वसंत’गड डगमगला. ‘वसंत’गडाच्या भक्कम तटबंदींना तडा गेला. ‘राज’निष्ठेच्या पायावर उभा असलेला हा गड काही प्रमाणात का होईना हलला आणि महाराष्ट्रातील तमाम मनसैनिकांना त्याचा हादरा बसला…
………………………
पक्षांतर्गत ‘राज’कारण आणि वसंतरावांचं खच्चीकरण !
लेखाच्या सुरुवातीची सारी वाक्यं एकाच व्यक्तीची, मनसेच्या शिलेदाराची, कट्टर मनसैनिकाची अर्थात वसंत मोरे यांची..!
पण या वाक्यांमध्ये कमालीचा विरोधाभास दिसून येत असल्यानं मनसेची पसंत असलेले ‘वसंत’राव रूसलेत, हिरमुसलेत हे नक्की ! आता ते कुणावर रूसलेत ? का रूसलेत ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेपासून सुरुवात करावी लागेल… राज ठाकरेंनी भोंग्यांविषयी घेतलेल्या भूमिकेनंतर, ‘मी ज्या भागाचं नेतृत्व करतो त्या भागात हिंदू-मुस्लिम एकोप्यानं राहतात त्यामुळं मी माझ्या भागात हनुमान चालीसा लावणार नाही,’
अशी उघड उघड भूमिका वसंतरावांनी घेतली आणि त्यांना पक्षाच्या शहराध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. एकेकाळी शहराध्यक्षपदी निवड होताच वसंतरावांना ज्यानं खांद्यावर बसवून वाजतगाजत पक्ष कार्यालयात नेलं त्याच खांद्यावर पक्षानं शहराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. नूतन शहराध्यक्षाची वाजतगाजत निघालेली मिरवणूक आणि पक्ष कार्यालयासमोर उधळलेला गुलाल, फटाक्यांची आतषबाजी पाहून वसंतरावांचा हिरमोड झाला. त्यात भरीस भर पडली ती पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांकडून सातत्यानं होणारी कुरघोडी; पदाधिकाऱ्यांशी होणार विसंवाद आणि दरवेळी त्यांच्या बाबतीत केली जाणारी टाळाटाळ; यामुळं वसंतरावांचं पुरतं खच्चीकरण झालं.
उत्तरसभेपूर्वी… उत्तरसभेनंतर… वाढतच गेलं अंतराहून अंतर !
वसंतरावांनी घेतलेली उघड उघड भूमिका राजसाहेबांच्या आदेशाविरुद्ध वाटल्यानं मनसैनिकांत वसंतरावांविषयी काही प्रमाणात नाराजी पसरली. ‘मनसेची पसंत, मोरे वसंत’ अशी ओळख असलेला निष्ठावान मनसैनिक अशी पक्षविरोधी भूमिका घेतोच कशी, असा प्रश्न महाराष्ट्राततील तमाम मनसैनिकांना पडला. तसाच तो राज ठाकरेंनाही पडला आणि ‘वसंत ‘शिवतीर्थ’वर ये,’ असा ‘राज’निरोप आला… पण जे पोटात तेच ओठांत अशी ओळख असलेल्या वसंतरावांना इथंही पोटात साठवून ठेवणं जमलं नाही आणि ‘शिवतीर्थ’वर जाण्यापूर्वी आपल्याला कुणी कुणी ‘ऑफर’ दिली याचा त्यांनी पाढाच वाचला. अखेर शिवतीर्थावर ‘राज-वसंत’ यांची भेट झाली आणि ‘राजसाहेब माझ्यासाठी कालही जिंदाबाद होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील,’ असं म्हणत पुढं उत्तरसभेत पहिलं भाषण ठोकलं. आता कुठं विस्कटलेली घडी पुन्हा बसली, असं वाटत असतानाच राजसाहेब पुणे दौऱ्यावर आले आणि 1 मे च्या औरंगाबाद सभेची घोषणा करून टाकली. त्यानंतर सारेच्या सारे कामाला लागले पण वसंतराव काही दिसेनासे झाले आणि कायम ‘ओपनर बॅटर’ म्हणून मैदानात उतरणारा हा खेळाडू मैदानात कमी आणि ड्रेसिंग रुममध्येच जास्त दिसू लागला. औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राजसाहेब दोन दिवस पुण्यात मुक्कामी आले पण त्यांच्या दिमतीला न जाता वसंतराव आपले तिथंही गैरहजर ! कायम राजसाहेबांसोबत असलेले वसंतराव औरंगाबादच्या दौऱ्यातही मागंच राहिले. राजसाहेब पुढं हे मागं, राजसाहेब पुढं हे मागं… अखेर त्यांच्यातलं अंतर वाढतच गेलं..!
…………………..
पुण्यात मनसेची महाआरती आणि वसंतराव कुठं तर तिरुपती बालाजी !
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी, ‘मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर 4 मे पासून हनुमान चालीसा वाजवू,’ असा अल्टिमेटम दिल्यानंतर मनसैनिकांनी ‘राज’आदेशाचं पालन करण्यास सुरुवात केली आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली… निदान आता महाआरतीसाठी तरी वसंतराव पुढाकार घेणार असं वाटत असतानाच त्यांनी हनुमाननाचं दर्शन घेण्याऐवजी थेट तिरुपतीला जाऊन बालाजीचं दर्शन घेणं पसंत केलं…
……………..
पुणेकरांच्या प्रश्नांसाठी थेट महापालिकेत जाऊन खास ‘मनसे स्टाईल’नं आंदोलन करण्यात पुढं पुढं असलेले वसंतराव; पक्षानं लावून धरलेल्या आंदोलनात मात्र का मागं पडले, हीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. असो, काल-परवा का होईना पण आपल्या भागात हनुमानाची महाआरती करून वसंतरावांनी अद्याप तरी आपल्या प्रभागात पक्ष टिकून आहे आणि मी ही पक्षातच आहे,हे दाखवून दिले हेही नसे थोडके !*
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी