मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मवीर’ पाहिला , पण सिनेमाचा शेवट न पाहताच निघून गेले असे का ?

577 0

मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिला. पण या चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र खरे कारण समजताच सगळ्यांच्याच भावना उचंबळून आल्या.

गेल्या 13 मे रोजी ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि रसिक आणि शिवसेना प्रेमींच्या या सिनेमावर उड्या पडल्या. अनेकांनी हा सिनेमा खूप आवडल्याचे सांगितले. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई देखील केली.

काल रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आयनॉक्समध्ये ‘धर्मवीर’चा खास शो ठेवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी आले. मात्र या सिनेमाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरच्या बाहेर पडले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा सिनेमा आवडला नाही की काय अशी शंका अनेकांच्या मनात आली. पण या शंकेचे निरसन मुख्यमंत्र्यांनी स्वतःच केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले,” ‘मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनय फारच जबरदस्त आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत. त्यांनी हे सर्व कसं केलं माहित नाही. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. पण मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावुक झाले होते . आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!