मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेलं मळभ, धुक, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, भाजप ही हा मुद्दा उचलून धरत ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना जशास तसे उत्तर देणार, असं सांगण्यात येत आहे.
खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेलं मळभ, धुक, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल, अर्थात हे राज्य आणि शिवसेना पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोक राज्य बिघडणवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. ही पोटदुखी आहे, जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील.
कोणाचा बुस्टर डोस माहीत नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. संजय राऊत यांनी ट्विट करून शायरी केली आहे. संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात..
लगता है फिरसे उतरना
पडेगा मैदान में दुबारा:
कूछ लोग भूल गये है..
अंदाज हमारा!!!
जय महाराष्ट्र!
आज क्रांतिकारी दिवस !!
लगता है फिरसे उतरना
पडेगा मैदान में दुबारा:
कूछ लोग भूल गये है..
अंदाज हमारा!!!
जय महाराष्ट्र!
आज क्रांतिकारी दिवस!! pic.twitter.com/G9SHBuIdU0— Sanjay Raut (@rautsanjay61) May 14, 2022