सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची अशी अवहेलना होत असते. तरीही त्याबद्दल कोणीही भूमिका मांडत नाही. महाराजांची अवहेलना केली म्हणून त्याबद्दल वाईटही का वाटत नाही असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर केला आहे. भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्यव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आणि राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.येत्या 3 डिसेंबर रोजी रायगडावर समाधी स्थळावर जाऊन प्रतिकात्मक लोकांचा आक्रोश, वेदना त्या ठिकाणी व्यक्त केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांबाबत आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.