पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-तलासरी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील भिलाडजवळ बंद असलेल्या दगडखाणीत त्यांचा वाहनासह मृतदेह आढळून आलाय.अशोक धोडी यांचा घातपात त्यांच्या सख्ख्या भावानेच केल्याचं उघड झालंय.अशोक धोडी यांच्यासोबत नेमकं काय घडलं? सख्या भावानेच धोडी यांचा घात का केला? पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट.
20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना बारा दिवसानंतर यश आल. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालंय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं आणि गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली होती. 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला. धोडी यांचा मृतदेह कारच्या मागच्या बाजूला दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळला.या घटनेने तलासरी आणि डहाणू परिसरात एकच मोठी खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वाद आणि इतर वादातून अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याचं आता उघड झालं आहे. आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध धंदा होता..या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अविनाश धोडी यांनी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल असा विश्वास पालघर पोलिसांनी धोडी यांच्या कुटुंबाला दिला आहे.