सोलापूर- निधी वाटपावरून शिवसेनेतील खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली आहे. अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक निधी दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला.
सावंत म्हणाले अर्थसंकल्पात 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 काँग्रेसला, 16 टक्के शिवसेनेला त्यातही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ 10 टक्के बजेट शिवसेनेला मिळालं आहे, असं सावंत म्हणाले. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. प्रचंड नाराजी आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे, असं ते म्हणाले.
सावंत म्हणाले, “सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना विस्थापितांचा गट आहे. कोणीही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आलं आहे ”
“उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार केली आहे. आता जसं जिल्हा बँकेत झालं, तसं छुप्या मार्गाने करतील. जिल्हा परिषद निवडणुका आहे, नंतर पंचायत समित्या, नगर पंचायती या ठिकाणी त्यांचा अजेंडा आहे. जो माणूस ताकदीने काम करत असेल, तर त्याच्या पायात खोडा कसा घालायचा. शिवसेनेला मागे कसं खेचायचं हा त्यांचा छुपा अजेंडा आहे. ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, त्या त्या ठिकाणी हे आपल्यावरच अस्त्र चालवायला लागले आहेत. तुम्ही हातात हात घालून एकत्र बसत आहात, तर आम्हाला टार्गेट नका ना करू. समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना, तो स्टेजवर बोलण्यापुरता शत्रू आहे का? आतमधून तुमची मिलीभगत आहे का? शिवसेनेचं सर्वकाही समोर असतं. छातीत वार करणारी ही संघटना आहे”, असं तानाजी सावंत म्हणाले.
“ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का ? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादीला लागू नाका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल. मागील अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”