मुंबई- सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे असे साकडे तुळजापूरच्या भवानीदेवीकडे मागितल्याचे बोलल्या होत्या. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील असे विधान केले. त्यावरून मनसेच्या गजानन काळे यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नुकतीच अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले.
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं. उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तरही सुप्रिया यांनी दिलं. “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्यावर संजय राऊत यांनी पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील असा विश्वास व्यक्त केला. आता त्यावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी दोघांवर टीका केली आहे. गजानन काळे यांनी म्हटले आहे की, ” विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणतात की २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. सुप्रिया सुळे म्हणतात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होऊ दे. मी तुळजाभवानीला नवस फेडायला येईन. राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री नको आहे हे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. पुढच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि संजय राऊत राष्टवादीकडून उपमुख्यमंत्री हे चित्र शिवसैनिकांना पाहणे बाकी आहे असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.