नवी दिल्ली- महाराष्ट्र काँग्रेसने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील उत्तर भारतीयांना मोफत रेल्वे तिकीटे दिली आणि त्यामुळे कोरोना उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये पसरला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलं. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी आता नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आक्षेप घेत युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या होत्या. आम्ही केवळ त्यांच्या तिकीटाचे पैसे दिले असे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काल भाषण झालं. खूप अपेक्षेने मी त्या भाषणाकडे पाहत होती कारण, फार अडचणीच्या काळात आपला देश चालला आहे. महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. कोविडची तिसरी लाट आता ओसरत आहे. चीनचा मुद्दा आहे. नोकरीचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या भाषणाकडे फार अपेक्षेने पाहत होतो. पण दुर्दैवं असं की, आपल्या महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान जे बोलले त्याबद्दल मला प्रचंड वेदना झाल्या. ज्या राज्याने 18 खासदार भाजपला निवडून दिले, नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहेत त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राचाही आहे. त्याच महाराष्ट्राचा उल्लेख पंतप्रधानांनी कोरोनाचा सुपरस्प्रेडर म्हणून केला, हे खूपच धक्कादायक आहे.
श्रमिक ट्रेन्सचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी कुठल्या राज्यातून किती ट्रेन्स गेल्या याची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ट्रेन्स महाराष्ट्र सरकार देत नाही तर केंद्र सरकार चालवतं. गुजरातमधून 1033 ट्रेन्स, महाराष्ट्रातून 817, पंजाबमधून 400 श्रमिक ट्रेन्स गेल्या. केंद्र सरकार ठरवतं कुठली ट्रेन कुठून आणि किती वाजता जाणार. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दल जे म्हटलं त्यामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना काळात ट्रेन सुरू करण्यात येत असल्याचे तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांचे आभार मानणारे केलेलं ट्विट दाखवून त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला.
राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अचानक लॅाकडाऊन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजुरांना वाऱ्यावर सोडलं होतं. त्याच मजुरांना महाराष्ट्र काँग्रेसने घरी सोडलं असं म्हणत मोदी यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात भाजप पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळं आपलं पाप केंद्र सरकार दुसऱ्यावर ढकलत आहेत असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. ट्रम्प यांचा कार्यक्रम करुन यांनी देशात कोरोना पसरवला. आणि हे थाळ्या वाजवत राहिले. आम्ही सेवा केली, असंही वडेट्टीवार म्हणाले.