एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

329 0

पुणे – राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, ” देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे”

कोरोना काळात अनेक जोखिमा असताना एसटी कर्मचाऱ्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे. एसटीमुळे आपले जीवन सुखकर झाले असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटीची ही वाटचाल चित्रफीतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, “एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे”

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, “सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्वपूर्ण करत एसटीने केले आहे. बदलत्या काळानुरुप एसटीने आपले पाऊले उचलली आहेत. आराम ते निमआराम तसेच आज नव्याने सुरू झालेली ‘शिवाई’ बस सेवा त्याचेच द्योतक आहे. राज्यभर या सेवेचा विस्तार लवकरच होत आहे ही आनंदाची बाब आहे. एसटी महामंडळाच्या मनुष्यबळ विकास तसेच विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी आपल्या सोबत आहे, असा विश्वास देत अपघात विरहित सेवेबद्दल त्यांनी वाहनचालकांचे कौतुक केले.

प्रास्ताविकात शेखर चन्ने म्हणाले, “महाराष्ट्राच्या अनेक जडणघडणीत लालपरीचा महत्वाचा वाटा. राज्यात व ३६ बसपासून सुरू झलेला एसटीचा प्रवास २५० पेक्षा जास्त आगर आणि १७ हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे. कोरोना कालावधीतही एसटीने बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या गावी पोहोचविण्याची महत्वाची कामगिरी केली. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असताना अनेकांना वाहतूकीची सेवा देण्याचे कार्य एसटीने केले. महामंडळाने व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक सेवा सुरू केली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ‘महाकार्गो’ ब्रॅण्ड विकसीत केला आहे. भविष्यात तांत्रिकदृष्टया सक्षम बस सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल” असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या अमृत महोत्सवी गौरवशाली कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा दिलेल्या ३० चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. परब याना ‘विठाई’ आणि गोऱ्हे यांना ‘शिवशाही’ गाडीची प्रतिकृती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!