मुंबई- शिवसेना आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, मात्र २४ तासात परत या. तुमच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल. असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मात्र त्यावर एकनाथ शिंदे यांनी आधी महाविकास आघाडीतून बाहेर पद, मगच चर्चा होईल अशी ठाम भूमिका घेतली आहे.
“ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल”, असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. “मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडा, तुमच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे नक्की विचार करतील, फक्त पुढच्या २४ तासांत मुंबईत या”, असा मेसेज संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले…
आमच्याकडे 40 आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. कारण संजय राऊत यांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान आपल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी मोठे खुलासे केले आहेत. आमदारांचं अपहरण करून भाजपने त्यांना आपल्यासोबत नेलं आहे. सर्वांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.