अलिबाग- महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे वाटोळे झाले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे. रस्त्यावर गद्दार फिरले नाही पाहिजेत, त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलिबाग येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. संजय राऊत म्हणाले, ” बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यानंतर २६० सेना स्थापन झाल्या. मात्र, आतापर्यंत केवळ दोनचं सेना राहिल्या आहेत. एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. गेल्या २२ वर्षांमध्ये तुम्हाला आनंद दिघे आठवले नाहीत. आता मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून तुम्हाला आनंद दिघे आठवले का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तीन पक्षाचं सरकार चालवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, असा हट्ट आम्ही धरला. शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी या देशातील ज्येष्ठ नेत्यांनी सरकार चालवायला संयमी माणूस आवश्यक असल्याचं सांगितलं, असं संजय राऊत म्हणाले.
आपल्याला या सभेनंतर कार्यक्रम करायचा आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना आपल्याला तसं करायचंय. शिवसैनिक जागेवर आहेत, आमदार वॉकरवर गुवाहाटीला चालतात, असा टोला संजय राऊत यांनी महेंद्र दळवींना लगावला. मी महेंद्र दळवींना फोन केला तर त्यांनी आराम करतोय सांगितलं, असे राऊत म्हणाले.
अलिबागमध्ये सध्या शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे आमदार नाहीत ते पुढील वेळी असतील. ठाण्याच्या भाईंना इकडचे दादा भारी पडतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. जे आमदार गुवाहटीच्या जेलमध्ये आहेत. ते भाजपचे कैदी आहेत. ब्लू रॅडिसनच्या जेलमध्ये बसले आहे. त्यांना निर्णय घेता येत नाही, श्वास घेता येत नाही. ते भाजपाचे कैदी आहात. बाहेर पडण्याची हिंमत नाही त्याहून महाराष्ट्रात येण्याची देखील हिंमत नाही. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले 22 आमदार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. त्यातील काही आमदार राष्ट्रवादीचे आहे. तरी शरद पवारांची तक्रार करत आहेत. ज्यांनी घडवले त्यांनाच नावे ठेवता ? असा सवाल संजय राऊत यांनी केला.