विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी निश्चित

275 0

मुंबई – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांसाठीही उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शिवसेनेने विधान परिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारमधील पक्षाचे नेते आमशा पाडवी यांना संधी दिली आहे.

सचिन अहिर यांचे पुनर्वसन

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पुनर्वसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत आमशा पाडवी?

आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधने नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचे काम केले आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण 2019 च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80 हजार 777 मते घेतली होती.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

  • विधानपरिषद निवडणुकीसाठी 2 जून रोजी अधिसूचना जारी होईल.
  • 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
  • 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल.
  • अर्ज मागे घेण्यासाठी 13 जूनची मुदत असेल.
  • 20 जून रोजी मतदान पार पडेल.
  • सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल.
  • 20 जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.

यांचा कार्यकाळ संपत आहे

  • सदाभाऊ खोत
  • सुजितसिंह ठाकूर
  • प्रविण दरेकर
  • सुभाष देसाई
  • रामराजे नाईक निंबाळकर
  • संजय दौंड
  • विनायक मेटे
  • प्रसाद लाड
  • दिवाकर रावते
  • रामनिवास सिंग
Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!