मुंबई- राज्यात निर्बंध हळहळू शिथील करतोय, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, ” . आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात निर्बंध हळहळू शिथील करतोय, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा. तसेच गुढीपाडव्याबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील. तसेच मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेतील. शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला विश्वास असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे टोपे म्हणाले.
रेल्वे, बस, मॉलमधील शिथीलकरणाबाबत टास्क फोर्सची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. परदेशात कोरोनाचा धोका वाढतोय, ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
मास्क वापरावा लागेल
मास्कमुक्तीचा सध्याचा सरकारचा विचार नाही, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, परदेशातील स्थिती पाहता मास्क वापरणं गरजेचं आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लसीकरणाचं लक्ष्य गाठण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, असे टोपे म्हणाले
मास्कमुक्तीचा सध्यातरी सरकारचा विचार नाही, तसेच मास्कमुक्तीचं धारिष्ट्य तुर्त केलेले नाही असे टोपे यांवेळी म्हणाले.
राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी पाहता, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, यादरम्यान, एकही मृत्यू झालेला नाही. या दरम्यान 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 960 वर पोहोचली आहे. तसेच, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 1,057,915 वर पोहोचला आहे.