चेन्नई- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ए. जी. पेरारिवलन मागील ३१ वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. न्यायालयाने कलम 142 नुसार प्राप्त विशेषाधिकाराचा वापर करत हा निर्णय दिला. यामुळे तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगाबाहेर येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याप्रकरणी निकाल दिला आहे. राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तमिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी यांच्या हत्येसाठी मानवी बॉम्बचा वापर करण्यात आला होता. लिट्टे संघटनेच्या शिवरासन याला ९ वोल्टची बॅटरी दिल्याचा आरोप पेरारिवलनवर होता. राजीव गांधी यांच्या हत्येचा कट प्रत्यक्ष अंमलात आणण्यात शिवरासन याची प्रमुख भुमिका होती. पेरारिवलन त्यावेळी १९ वर्षांचा होता.
पेरारिवलन मागील 31 वर्ष तो तुरुंगात होता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्याला टाडा न्यायालयाने 1998 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. पण 2014 मध्ये या शिक्षेचे रुपांतर आजीवन कारावासामध्ये करण्यात आले.