मुंबई- आमचे हे एक दिवसाचे आंदोलन नसून मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे म्हणाले, ” महाराष्ट्रात जवळपास 90-92 ठिकाणी सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन, आमचा विषय आहे विषय त्यांना समजला. पोलिसांचे देखील मी आभार मानेन. या विषयाचे मला क्रेडिट नको. क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे.
मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान पहाटे 5 वाजण्याच्या आत वाजवली गेली. अजान लाउडस्पिकरवरून वाजवायची नाही असे पोलिसांचे आदेश असताना या मशिदीवर अजान कशी वाजवली गेली. त्यांच्यावर कारवाई का झाली नाही. फक्त आमच्यावरच का कारवाई केली जाते ? जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हा आंदोलनाचा एक दिवसाचा विषय नाही. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. या विषयाला धार्मिक वळण दिल्यास त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. जोपर्यंत मशिदीवरील अजान लाऊड स्पीकर वरून वाजवली गेल्यास आमचे कार्यकर्ते त्याठिकाणी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच !