औरंगाबादमध्ये 9 मेपर्यंत जमावबंदी ! राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ?

428 0

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी आयोजित केलेली सभा होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला १३ विविध संघटनांनी विरोध केला आहे. पोलिसांनी देखील सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून 09 मे 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये पाचपेक्षा अधिक लोक विनापरवाना एकत्र जमू शकत नाही. रमजान ईद ,महापुरुषांच्या जयंती आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काढले जमावबंदीचे आदेश काढल्याची माहिती मिळत आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. विविध सणवार, संभाव्य आंदोलनाची कारणं देत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार का , हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी देतील असा विश्वास औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!