औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. उद्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जंगी सभा होणार असून या सभेची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या सभेसाठी राज ठाकरे औरंगाबाद येथे दाखल झाले असून मनसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले. क्रांती चौकात ढोल ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भगवे फेटे घातलेल्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेकडो मनसैनिक क्रांती चौकात उपस्थित होते.
क्रांती चौकात राज ठाकरे गाडीतून उतरले आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन हॉटेलकडे रवाना झाले.
उद्या औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरुन राज ठाकरे तोफ डागणार आहेत. याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला आहे. तसेच ते भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबरोबरच राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या रिक्षांमार्फत शहरात या सभेचा प्रचार करण्यात येणार आहे. याच प्रचार रिक्षांचा आज मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
दरम्यान, आज राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे जाताना रस्त्यात ठिक-ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. अहमदनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.