मुंबई- औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले. राज ठाकरेंनी दिलेल्या या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर गृह विभाग सावध झाला आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.
एकीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेणार असून दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.
मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार असून या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत पुढील रणनिती ठरेल.
75 हजार मनसैनिकांना नोटीस
राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले आहे. राज्यभरातील तब्बल 75 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.